TOD Marathi

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं परवा म्हणजे 14 ऑगस्टला अपघाती निधन झालं. पण त्यांच्या गाडीसोबत घडलेली घटना हा अपघात आहे की घातपात आहे? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच आता शिवसंग्रामच्या (Shivsangram) बीडच्या पदाधिकाऱ्यांनी एक नवा खुलासा केला आहे. याआधीही त्यांच्यासोबत घातपाताचा प्रयत्न करण्यात आला होता, असं शिवसंग्रामचे पदाधिकारी अण्णासाहेब वायकर यांनी सांगितलं.

तीन ऑगस्टला बीडहून पुण्याला जात असताना शिक्रापुरच्या आसपास दोन गाड्यांनी पाठलाग केला. जेव्हा आयशर गाडीने हा पाठलाग केला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा ही गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचं मी मेटे साहेबांना सांगितलं. पण ड्रायव्हर नशेत असेल म्हणून तो वारंवार पाठलाग करत असेल, असं ते म्हणाले. त्यामुळे आम्ही शांत बसलो. पण आता जो अपघात झाला त्यातही जर आयशर गाडी असेल आणि तीन तारखेला पाठलाग केलेलीच गाडी असेल, तर हा घातपात आहे, आम्ही शांत बसणार नाही, असंही ते म्हणाले.

विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्टला पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Expressway) अपघात झाला. मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.